Blogroll

त्वचाभेदी माश्या

 त्वचाभेदी माश्या

 त्वचाभेदी माश्या

शेतकरी बांधवांच्या घरी किंवा शेतावर गाई, म्हशी, बैल, घोडे अशी पाळीव जनावरे असतात. जिवंत असताना ती राब राब राबतातच. या जनावरांना काही माश्या कायम छळत असतात. त्यांना शेपटीने हाकलून जनावरांना वैताग येतो. तरीही त्या हाकलल्या जात नाहीतच. अनेक माश्या एकाच वेळी घोंगावणारा आवाज करीत गुरांना घेरू लागतात. त्याच्या आवाजाने गुरांचे मन:स्वास्थ्य ढासळतं आणि नेहमीच्या वागण्यावर, दूध आणि मांसाच्या उत्पादनावर घसरता परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
एवढेच नाही, तर हायपोडरमा (त्वचेखाली राहणार्‍या) नावाच्या माश्या जनावरांच्या कुजू लागलेल्या जखमांवर, पातळसर असलेल्या ओठांवर अथवा पुढील पायांच्या फर्‍यावर एकावेळी अनेक अंडी घालतात. जखमांवर घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या कुजलेले मांस खाता-खाता मासांत घुसतात. जखमा नळ्यांसारख्या लांबसर पोखरतात. त्या पोकळीत चिकट असा अर्धा घन, अर्धा द्रव पदार्थ साठून राहतो. (बुचर्सजेली) त्याने मांसाचा दर्जा कमी होतो. जनावरे बेचैन होतात. गाई, म्हशी, दूध कमी प्रमाणात देऊ लागतात. त्यांचे वजन घटू लागते. एव्हाना शरीरात घुसलेल्या, स्थलांतर करीत राहिलेल्या अळ्यांची वाढ पूर्ण झालेली असते. त्या गुरांच्या शरीराबाहेर पडण्यासाठी कातडीचा कमी जाड भाग शोधून काढतात. तेथे पुन्हा कातडीला जखमा करून तेथील उतींचा फराळ करून शरीराबाहेर येतात. शरीर सोडून जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात. कोशावस्था पूर्ण करून झाल्यावर मिलन आणि अंडी घालण्याचे जीविताचे लक्ष पूर्ण झाल्या-झाल्या चार-पाच दिवसांतच जगाचा निरोप घेतात.
त्यांनी केलेल्या जखमांकडे लक्ष दिले गेले नाही, तर जीवाणू संसर्ग होऊन 'मायासिस' आजाराला आमंत्रण दिले जाते. या आजाराने गुरे दुबळी होतात अतिशय अशक्त आणि चैतन्यहीन बनतात व अखेरीस प्राणालाच मुकतात.

No comments:

Post a Comment